संपर्क क्रांती, निवडणूक आणि 1950
डिजिटल युगातील मध्यावधी निवडणूक म्हणून यंदाची निवडणूक ओळखली जात आहे. एक प्रकारे ॲप च्या मदतीने होणारी ही या स्वरुपाची पहिली निवडणूक आहे असेही म्हणता येईल. सोबतच मतदारांसाठी देण्यात आलेल्या 1950 या टोल फ्री क्रमांकालाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
जगात मोबाईलचा शोध लागल्यानंतर प्रथम केवळ मोबाईल ते मोबाईलवर बोलण्यास सुरुवात झाली त्यानंतर मोबाईल ते लॅडलाईन संपर्क सुरु झाला.
मोबाईल क्रांतीचे अनेक टप्पे आपणास सांगता येतील याचे पहिलं रुप पेजर आपण बघितलं. तो एकतर्फी संदेश देण्याचा यशस्वी प्रयत्न ठरला त्यानंतर मोबाईलमध्ये आलेल्या शॉर्ट मेसेजिंग सर्व्हीस अर्थात एसएमएस ने त्याची जागा घेतली यात खऱ्या अर्थाने संवाद सुरु झाला होता.
मोबाईल एस.एम.एस. वरुन मल्टीमिडीया संदेश अर्थात एम.एम.एस. कडे वळला यात सचित्र संदेशाची सोय होती. नंतरच्या काळात आलेल्या व्हॉटस अप सारख्या नव्या संवाद माध्यमांनी या दोन्ही सेवा संपवल्या. व्हॉटसअपवर बिनाखर्चाचे संदेश पाठवणे शक्य होते. व्हॉटसअप भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झाले.त्यानंतर भारतात असणारी तत्कालीन क्रमांक एकची कंपनी बी.एस.एन.एल ने अधिकृतरित्या MMS सेवा बंद करण्याची अधिकृत घोषणा केली.
काही गोष्टी कालपरत्वे बदलत जातात. त्या काळाच्या ओघात कोणेकाळी सर्वाधिक महत्वाची यंत्रणा टेलिग्राम लोप पावली असे बदल तंत्रज्ञानाच्या शोधासमवेत घडत जातात.
मोबाईलवर कॉल करणे खर्चिक होत अशा मुळातच बुध्दीमान असणाऱ्या भारतीयांनी त्याच मोबाईलवर 'मिसड्' कॉलचा शोध लावला. यात खर्च शून्य होता. 'तू घरुन निघालास की एक मिसकॉल दे' हा संवाद हमखास ऐकायला मिळतो.
2001 साली अमिताभ बच्चनची 'कौन बनेगा करोडपती' ही मालिका प्रथम छोट्या पडद्यावर आली. त्यावेळी SMS ला पैसे लागायचे आता त्याच्या ताज्या मालिकेत या एसएमएस ची जागा 'ॲपने' घेतलेली आपणास दिसली.
पैसे कमीत कमी खर्च करण्याची भारतीयांची मानसिकता लक्षात घेवून विविध कंपन्यांनी याच काळात टोल फ्री क्रमांकाची संकल्पना आणली आणि झटपट लोकप्रिय झाली. एक पैसा खर्च न करता सेवा प्राप्त करणे माहिती मिळविणे इथवर आपण पोहोचलो आहोत.
भारतात लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव असणाऱ्या या मध्यावधी सार्वत्रिक निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाने देखील 1950 हा असाच टोल फ्री क्रमांक कोट्यावधी मतदारांना उपलब्ध करुन दिला आहे.
1950 या क्रमांकावर संपर्क साधून मतदारांना मतदार यादीतील आपला क्रमांक, प्रभाग, मतदान केंद्र आदीची माहिती झटपट मिळत आहे. त्यामुळे या क्रमांकावर येणाऱ्या कॉल्सची संख्या दिवसागणीक वाढत आहे. संख्या वाढली याचा अर्थ मतदार आता जागरुक झाला आहे असा होतो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे हे देखील स्पष्टच आहे.
या व्यतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र याच्या कार्यालयास अविरत अर्थात 24X7 माहिती देणारे दोन क्रमांक सुरु करण्यात आलेले आहेत. 022-22040451 आणि 022-22040454 हे ते दोन क्रमांक आहेत. मतदारांपर्यत माहिती पोहचवण्यासाठी आयोग व जिल्ह्यामधील यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.याला प्रतिसादही मिळत आहे त्यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढेल याबाबत आशा निर्माण झाल्या आहेत......
No comments:
Post a Comment